मनमनमंजिरी

मनमनमंजिरी

Saturday, December 20, 2014

बाबा

ही सहा महिन्यांची गरोदर... अचानक हिला जाणीव होते नवऱ्याच्या भयाण आजाराची. आज पर्यंत हा साधा खोकलाच वाटायचा तिला म्हणून ती आणि घराचे सारे निर्धास्त होते. हे जीवघेण आजारपण... आपल्या या पोटातल्या बाळाचा तर पायगुण नसेल ?? म्हणून सिद्ध झाली ती बाळ पडायला...... भरपूर रानटी औषधपाणी झाले. पण बाळ नशीब घेवून आलेलं ... चिवट ... कुठल्याही औषधाचा फरक पडला नाही.. आणि....
पाच भावंडांच्या पाठीवर एक सहावं बाळ तिच्या पोटी जन्माला आलं. तेव्हा नवऱ्याची तब्येत अजून बिघडलेली....  हिचा स्वभाव भयंकर.. काहीतरी डोक्यात घेवून बसलेली... त्यामुळे बाळाला पाजायलाही तयार नाही. हिची मोठी मुलगी... वय वर्षे अवघे १२... नौकारांकडून गायीचे दूध काढून या तान्हुल्या भावाला बोळ्याने दूध पाजू लागली.. अवघ्या ६ महिन्यांचा असतांना वडील सोडून गेलेत.  
वडिलांच्या मुळावर असलेले हे नाराजीचे बाळ .... आपल्या ५ भावंडांसोबत वाढू लागलं. स्वाभिमानी आई .... सासरच्या वागणुकीने जराही डगमगली नाही. आपल्या सहा मुलांना घेवून तिने माहेर गाठले... शिक्षणाबद्दल अत्यंत आवड म्हणूनच बरीस्टरशी लग्न केलेले.... मुलांनीही आपल्या वडिलांसारखे शिकून मोठे व्हावे अशी दुर्दम्य इच्छाशक्ती. शिक्षणाकरता मुलांना माहेरी ठेवले. सर्व मुले प्रतिकूल परिस्थितीत शिकलीत. लहान मुलगाही शिक्षणाची आस लावून.... त्याला नुसते पदवीधर नाही तर इन्जीनीअर व्हायचे होते. भावंडांनी हिम्मत बांधली... पण नुसत्या हिमतीवर काही होत नसते... त्याला पैशांचीही जोड लागते... इकडे फी भरायची वेळ आली आणि आई फी भरायची म्हणून कापूस विकायला गेलेली... शेवटचा दिवस... हातात पैसे नाहीत.. काय करणार... सर्व स्वप्न उध्वस्त होत असलेली दिसतांना अचानक एक मित्र समोर आला...त्याच्या वडिलांनी फी चे पैसे दिलेत... आई धापा टाकत संध्याकाळी आली. आणि मित्राचे पैसे वापस केले. ज्या शेतीमुळे आपल्याला मित्रासमोर हात पसरावे लागले त्या शेतीवर पुन्हा जायचे नाहीच... अशी घृणा मनात घर करून बसली. आणि मग ५० वर्ष याने शेतीकडे बघितले देखील नाही. इंजिनियर होवून पूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. मधला भाऊ संघाचा प्रचारक, आणीबाणीत मोठ्या भावाची नौकरी गेली. त्याचा संसार सांभाळला. याच्यापेक्षा मोठी असली तरी घरात लहान असलेल्या बहिणीचे लग्न... अचानक आलेल्या नवऱ्याच्या आजारपणाने विखुरलेला मोठ्या बहिणीचा संसार सांभाळला. या सर्व दिव्यातून निघाल्यावर घरच्यांनी याच्या लग्नाचा विचार केला.
लग्न झाले... एक मुलगा दोन मुली .... सरकारी नौकरीत एव्हाना ऑफिसरचा थाट.... दर तीन वर्षांनी बदली झाली तरी टुमदार घर, सरकारी गाडी, ड्रायव्हर, नौकर चाकर. आई आणि भावंडांना भारीच कौतुक. आपल्या ताकदीवर उभ्या असणाऱ्या लहान भावाच्या घरी हक्काने महिना दोन महिने राहायचे.
माझे बालपण ज्या काबाडकष्टात गेले... लोक ज्या हीन दृष्टीने काहीच चूक नसतांना आमच्याकडे बघायचे त्या कुठल्याही गोष्टीची सावली माझ्या मुलांवर मी पडू देणार नाही असे छातीठोकपणे म्हणणारा एक बाप.... मुलांच्या तोंडून निघालेली प्रत्येक गोष्ट त्यांच्या पुढ्यात आणून टाकणारा... मुलांसोबत प्रत्येक खेळ खेळणारा... हुंदडणारा आमचा हरहुन्नरी बाबा...
बाबा खरंच कित्ती आणि कसले कसले हट्ट पुरविलेत तुम्ही आमचे.... आंब्याच्या रासाशिवाय मी जेवणार नाही असा माझा पणच असायचा..... आम्ही नागपूरला असलो कि आजही तुम्ही आमच्याशिवाय जेवत नाहीत. कितीही वेळ झाला तरी थांबून असता... 
कोणी आम्हाला विचारले तुमचे बाबा कसे ?? तर क्षणभर आम्हालाही प्रश्नच पडतो.. भारतात पहिल्यांदा रेडीयम रोड  डिव्हायडर्स आणणारे एक इंजिनियर, एक ऑफिसर, एक समाजसेवक, कि अटलजींची भाषणे, मुरारी बापूंची प्रवचने अस्खलीत म्हणून दाखविणारे कि भीमसेन जोशी,वसंतराव देशपांडे, जितेंद्र अभिषेकीची गाणी तासंतास ऐकणारे, त्यांच्या कार्यक्रमात देहभान होवून बसणारे, संघाच्या शाखेत दररोज जाणारे, आपल्या पगारातील दरमहा गुरुदक्षिणा बाजूला ठेवणारे, ज्ञानेश्वरी – दासबोध – गीतेचे अभ्यासक, कि अजूनही वेगवेगळ्या चाली लावून पेटी वाजविणारे संगीतप्रेमी कि राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण या विषयावर बेमालूम चर्चा करणारे क्रिकेटप्रेमी ... कि अग, त्याला किती त्रास द्यायचा म्हणून ड्रायव्हरला घरी बसवून इलेक्ट्रिक बिल भरायला जाणारे..
माणुसकी जपणारा एक देव माणूस म्हणजेच आमचे बाबा...        
बाबा म्हणून लोक जे काही करतात त्यापेक्षा काकणभर तुम्ही जास्तच केलेत आमच्या करता.... म्हणून आजही कुठलीही गोष्ट तुम्हाला सांगायला आम्ही घाबरत नाही...लोक “वडिलांचा धाक” हा शब्द वापरतात पण आम्ही तो कधीच अनुभवला नसल्याने या शब्दाबद्दल खूप कुतूहल आहे अजून. आई आणि बाबा या दोघांमध्येही समतोल.... कधीच घरात भांडे वाजले नाही... म्हणूनच एका मस्त वातारणात आम्ही जगलो... वाढलो...

No comments:

Post a Comment